महसूलच्या ‘जनसंवाद’ ने कचरेवाडीतील दोन सख्ख्या भावांची दुभंगलेली जोडली मने
तहसीलदार मदन जाधव यांचा अनोखा उपक्रम
मंगळवेढा संभाजी नागणे
हल्ली गरीब श्रीमंत घरी सख्खे भाऊ म्हंजे सत्ता,संपत्ती वरून वादविवाद होणे सर्वसामान्य बाब झाली आहे.तशीच एक घटना मंगळवेढा तालुक्यातील…गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांच्या घरी जाणे दूरच पण तोंडही पाहणे नाही…दोन्ही घरात बेबनाव, ताणतणाव आणि भांडणे रोजचीच…आणि या सर्वाचे निमित्त एका भावाने दुसऱ्या भावाचा अडवलेला रस्ता..! हा पाच वर्षाचा वाद तहसीलदार मदन जाधव यांच्या पुढाकाराने मिटला अन दोघे सख्खे भाऊ पुन्हा एकत्र आले आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले.
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावच्या हद्दीमध्ये जमीन असणाऱ्या रामेश्वर मारुती पडवळे यांचे कचरेवाडी हद्दीतील गट क्रमांक 163/2/ब सिद्धेश्वर मारुती पडवळे यांचे गट क्रमांक 163/2/क येथे प्रत्येकी 1 हेक्टर 32 गुंठे क्षेत्र आहे.तसेच पाच वर्षांपासून येथील रस्त्याबाबत दोन्ही भावांचा वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसन भांडणात होऊन दोन्ही कुटुंबातील सदस्यांची मने दुभंगली होती. रस्त्यावरून होणाऱ्या वादाचा परिणाम वारंवार घरगुती भांडणात होत होता.
या रस्त्याबाबत तहसील कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरण सुरू होते. दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडण्यासाठी वकिलांची नेमणूक केली होती.
या दोघांना तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताह अंतर्गत ‘जनसंवाद’ या उपक्रमामध्ये हा रस्त्याचा विषय आपसी सामंजस्याने सोडविण्याबाबत तहसीलदार मदन जाधव यांनी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत या दोन्ही भावांनी गेल्या पाच वर्षांपासून चाललेला रस्त्याचा वाद आपसी सामंजस्याने मिटविण्याचा निर्णय घेतला. महसूल सप्ताह निमित्त केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही भावांनी निर्णय घेतला आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला दोन्ही वकिलांनीही आनंदाने होकार दिला व दोन भावांमध्ये आपसी समझोता होण्यासाठी प्रयत्न केले.
आज 10रोजी तहसिल कार्यालयात दोन्ही भाऊ आणि दोन्ही बाजूचे वकील यांनी उपस्थित राहून आपसी लेखी तडजोडनामा तयार करून सादर केला.
यावेळी तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते दोन्ही भाऊ व दोन्ही वकील यांना रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाच वर्षापासून चाललेल्या रस्त्याचा वाद आपसात मिटवल्याने दोन्ही भावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर केवळ रस्त्याचाच नाही तर कुटुंबातील सुद्धा वाद मिटून दोन्ही कुटुंबातील मने जुळल्याचा भाव स्पष्ट दिसत होता.
या प्रकरणामध्ये तहसीलदार मदन जाधव,वकील मनीष दिलीपकुमार मर्दा आणि अनिल दुधाळ यांनी मोलाची भूमिका बजावली.याप्रमाणेच तालुक्यातील इतरही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचे वाद आपसात मिटल्यास शेतकऱ्यांचा वेळेची व आर्थिक बचत होणार आहे. शिवाय गावातील वातावरणही सौहार्दपूर्ण रहायला मदत होणार आहे. याबाबत महसूल विभागाकडून तहसीलदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती केली जात असून उर्वरित वाद लवकरच सोडवले जाणार आहेत.
कोट-
मंगळवेढा तालुक्यात रस्ता वादाची 90 प्रकरणे येथील महसूल विभागाकडे असून ती प्रकरणे कोणावरही अन्याय न होवू देता सामंजस्याने तडजोड करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.शेतकऱ्यांनी महसूलच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन आपली प्रकरणे निकाली काढून वेळ व खर्च वाचवावा. काही प्रकरणात वादी प्रतिवादी यांच्याबरोबर चर्चा करून तडजोडीने प्रकरणे मिटवली जातील
– तहसीलदार मदन जाधव

