मंगळवेढा प्रतिनिधी
शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी पुरेशी वीज मिळून शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरु केली असून, या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.ए.भोळे यांनी केले.
महावितरण विभागीय कार्यलय पंढरपूर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी’ योजनेतंर्गत ग्राहक तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र भुतडा,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सदस्य अण्णा एतवाडकर, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे ,संघटक महेश भोसले, सचिव प्रा. धनंजय पंधे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री भोळे म्हणाले,शेतीवरील खर्च कमी होवून शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी व शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. शेतीसाठी पाण्याचे अत्यंत महत्व आहे आणि ते मिळवण्यासाठी विजेची गरज असते ही वीज जर अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून म्हणजे सौर उर्जेतून मिळविण्यात आली तर हे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे होणार आहे. शेतकरी वापरत असलेले पारंपारिक विजेवर चालणारे कृषी पंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या समस्यांमुळे अखंडित व शाश्वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात, तसेच जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषी पंप चालवितात आणि अत्यंत महागात पडते, पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेत निवारण करण्यात आले. तसेच वीज जोडणी, जादा वीज बील आकारणी आदी बाबत शंकाचे निराकरण करण्यात आले.

