म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आवर्तन मंगळवेढयासाठी तातडीने देण्याच्या आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना
शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज भरण्याचे केले आवाहन
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 15 गावांमध्ये म्हैसाळच्या योजनेतील पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना दिल्या आहेत. तसेच या योजनेच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी देखील म्हैसाळच्या पाण्यासाठी मागणी अर्ज त्वरित भरून द्यावेत असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात कमी पावसामुळे पाणी पातळी खाली गेली आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे या भागात शेतीच्या पाण्यासाठी गरज भासू लागली आहे. या भागातील लोणार, पडळकरवाडी, सलगर बू सलगर खु, महमदाबाद आसबेवाडी लवंगी, येळगी, हुनुर, रेवेवाडी मारोळी, शिरनांदगी शिवणगी, जंगलगी चिक्कलगी या भागात म्हैसाळ सहाव्या टप्प्यातील कामे बऱ्यापैकी झाली असून या कामामुळे या परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळनार आहे. सध्या या भागात शेतकऱ्यांना पिकांना जोपासण्यासाठी व उन्हाळी पिके करण्यासाठी पाणी मिळणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी दुष्काळ असणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून ही योजना मार्गी लावली आहे. म्हैसाळ सहाव्या टप्प्यातील योजनेमुळे दक्षिण भागातील 15 गावांमधील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.बागायती क्षेत्र वाढणार असल्याने या भागातील
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण होणार आहे.
या भागातील शेतकऱ्यांची अनेक दिवसापासून ची शेतीसाठी पाणी मिळण्याची मागणी पूर्ण होत आहे गेल्या काही दिवसापूर्वी या योजनेतून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा झाला होता. तसेच काही भागातील पाझर तलावात देखील पाणी सोडता येत असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता होणार आहे. या भागात सध्या शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने या योजनेतून पाणी सोडण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आ.आवताडे यांच्याकडे मागणी केली आहे.
दिनांक 23 रोजी आमदार अवताडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीबाबत पाठपुरावा करत या योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना म्हैसाळच्या या योजनेतून या भागातील शेतकऱ्यांसाठी आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यावर पवार यांनी पाणी सोडण्याबाबत आश्वासन दिले असून या भागातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज तातडीने द्यावेत, मागणी अर्ज घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयाचा अधिकारी देखील देणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे तातडीने पाण्याचे आवर्तन मिळण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज तत्काळ संबंधित विभागाकडे द्यावेत असे आवाहन देखील यावेळी अवताडे यांनी केले

