मंगळवेढेकरांसाठी मिळणार आनंदाची बातमी
आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाला यश,सरकारकडून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मिळणार मान्यता
मंगळवेढा संभाजी नागणे
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाला यश येत असून आज दिनांक 13रोजी मुंबई येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी मान्यता मिळणार असून लवकरच कामासाठी निधी तरतूद होवून निविदा निघणार असल्याची माहिती आ समाधान आवताडे यांनी सोलापूर मिरर शी बोलताना दिली.
यामुळे या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार असून गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागातील अनेक गावात कायमस्वरूपी दुष्काळ असल्याने या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आ आवताडे यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत आहे. या भागातील 19 गावांना म्हैसाळच्या योजनेतील पाणी मिळण्यास सुरवात झाली असताना राहिलेली 24 गावे मात्र वंचित राहिली आहेत.त्यामुळे या गावांना उजनीच्या पाण्यातून या भागाला पाणी देण्याचे सरकारकडून नियोजन करण्यात येत आहे त्यासाठी सुमारे 900कोटीची योजना असून बंदिस्त पाइपलाइन द्वारे हे पाणी दिले जाणार आहे.
योजनेला यापूर्वी मंजुरी मिळाली असली तरी कार्यान्वित न झाल्यामुळे तसेच निधी न मिळाल्याने ही योजना रखडली होती.पुन्हा या योजनेसाठी सुप्रमा घेण्यासाठी प्रस्ताव बनवला परंतु काही तांत्रिक अडचणी व काही विभागाच्या परवानगी राहिल्यामुळे ह्या योजनेस मंजुरी मिळाली नव्हती. तसेच सरकारकडून निधी मिळत नव्हता. आघाडी सरकार व फडणवीस सरकार यांच्या काळात पूर्वी मंजूर असलेल्या या योजनेसाठी निधी मिळणे अपेक्षित होते परंतु हा निधी मिळाला नाही. कै आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान प्रचार प्रसंगी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आमदार समाधान आवताडे यांना निवडून द्या या भागाला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन केले होते त्यानंतर देखील या भागात आल्यानंतर त्यांनी पाणी देण्याविषयी सुतोवाच केले होते. परंतु अद्याप पर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नव्हता परंतु आमदार समाधान आवताडे यांनी आमदार झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने आवाज उठवला. शिंदे फडणवीस सरकार निधी देत नाही त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. परंतु आमदार समाधान आवताडे यांनी शांततेत क्रांती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सातत्याने आपला पाठपुरावा सुरू करीत प्रस्तावातील तांत्रिक त्रुटी दूर करून घेतल्या व मंजुरीसाठी व निधीसाठी गेल्या तीन दिवसापासून ते मुंबई येथे तळ ठोकून आहेत. मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावातील तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन बाकी सर्व बाबी पूर्ण करत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मंजुरीचा हा प्रस्ताव घेण्यात आला असून या बैठकीत या योजनेला कोणत्याही परिस्थितीत मंजुरी दिली जाणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. भाजपाला घेरण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा विषय विरोधकांनी उपस्थित केल्याने आमदार आवताडे यांनी षटकार मारत या योजनेसाठी मंजुरी घेत विरोधकांच्या आरोपाना कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

