मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मंजूर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात- आ.समाधान आवताडे
5 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात मंत्री व अधिकारी यांची बैठक
मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत मंगळवेढा तालुक्या च्या दक्षिण भागातील शेतीच्या पाणी प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी देऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देणेकामी शासन दरबारी असणारी कार्यवाही अंतिम टप्प्यात असून या मंजूऱ्यांच्या संदर्भात येत्या ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या मंत्रालययीन दालनामध्ये संबधित मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली.
गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेची पाणी प्रश्नावर असणारी तळमळ लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आवताडे हे तालुक्याचा पाणीप्रश्न वेळोवेळी शासन दरबारी लावून धरत आहेत. सदर योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व ही योजना लवकरात- लवकर मार्गी लागावी यासाठी आ.आवताडे यांनी वेळोवेळी शासनाकडे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे , राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा व प्रत्यक्ष पत्र व्यवहार केलेला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ आवताडे यांच्या प्रचार सभेत बोलताना सांगितले होते की, या मतदारसंघांमध्ये तुम्ही आमदार आवताडे यांना विजयी करुन त्यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला आणखी एक लोकप्रतिनिधी द्या व त्यानंतर मंगळवेढा उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी मी स्वतः राज्यातून नाही मिळाला तर केंद्रातून निधी आणेन पण ही योजना पूर्ण करेन असा शब्द दिला होता. नंतरच्या काळात राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस ही राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे या योजनेचे जवळपास सतरा हजार एकशे सत्याऐशी हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक मंजुरीची चक्रे आणखी गतिमान झाली व ना.फडणवीस यांच्या माध्यमातून आ आवताडे यांच्या अहोरात्र प्रयत्नांना या शासन दरबारी झालेल्या कार्यवाहीमुळे मोठे यश मिळताना दिसत आहे. या योजनेसाठी आ. आवताडे वेळोवेळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांचेसमवेत बैठक घेतल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून एल.एस. टी.सी कडे व इतर प्रशासकीय अडचणीमुळे अडकून पडलेल्या या योजनेला आमदार आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सततच्या पाठपुराव्यामुळे आणि फडणवीस साहेब यांच्या अनमोल सहकार्यामुळे या योजनेचा शासन दरबारी प्रस्ताव सादर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुढे शासनाकडून प्रशासकीय मंजूरी मिळवून स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देण्याचे फडणवीस साहेबांनी मान्य केले आहे व त्या अनुषंगाने ५ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या योजनेस सुधारित प्रशासकीय मंजूरी व निधी मिळून त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले आहे.
एकीकडे आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा होत असताना तालुक्याच्या या भागातील कायम दुष्काळी झळा सोसणाऱ्या जनतेला या योजनेमुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे. तालुक्याचे एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आ आवताडे हे मतदारसंघातील विविध मूलभूत व पायाभूत विकास कामांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करून मतदार संघामध्ये धोरणात्मक प्रगतीची गंगोत्री मोठ्या प्रमाणात प्रवाहित करुन परिवर्तनशील मतदार संघाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. राजकारणाच्या वेळी राजकारण परंतु सर्वसामान्यांसाठी समाजकारण करत असताना आ आवताडे यांनी आतापर्यंत कोणताही राजकीय आकस मनात न ठेवता आपले विकसात्मक कार्य अविरतपणे पुढे चालू ठेवले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून व आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून ही योजना आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना कोणीही राजकीय अभिलाषा समोर न ठेवता जनतेचा पाणी प्रश्न आणि तालुक्याचे दुष्काळी सावट हटविण्यासाठी एकीचे बळ निर्माण करण्याची गरज असल्याचेही आ आवताडे यांनी सांगितले आहे.

