24 गाव पाणी योजना येत्या अधिवेशनात 100 टक्के मार्गी लागणार – आ. समाधान आवताडे
मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित 24 गावांसाठी असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस येत्या अधिवेशनाच्या अगोदर तांत्रिक मान्यता घेवून अधिवेशन काळात योजनेस निधी मिळणार असून 100 टक्के योजना मार्गी लागणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी पाटकळ येथे गाव भेट दौरा प्रसंगी सांगितले
आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गाव निहाय नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले आहे. आज दिनांक सहा रोजी पाटकळ येथे या दौऱ्याच्या आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील लोकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 24 गावातील नागरिकांना शेतीचे पाणी मिळावे यासाठी रखडलेल्या योजनेस तांत्रिक मान्यता चार आठ दिवसात मिळणार असून ही मान्यता मिळाल्यानंतर अधिवेशन काळात या योजनेसाठी सरकारकडून निधी दिला जाणार आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहे. फडवणीस साहेबांकडून या योजनेला भरघोस निधी देणार असल्याचे सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना घाईगडबडीने निकृष्ट पद्धतीने झाली असल्याने या भागातील लाभार्थी गावांना पाणी मिळाले नाही परंतु ही बंद पडलेली योजना सरकार दरबारी पाठपुरावा केल्याने गेल्या महिन्याभरापासून ही योजना पुन्हा सुरू झाली असून या योजनेतील वीस ते बावीस गावांना पाणी मिळू लागले आहे. उर्वरित गावांना देखील पाणी दिले जाणार आहे या योजनेत अनेकांनी हात ओले करून घेतले असून पाठीमागील चुका न काढता सद्यस्थितीत ही योजना चांगल्या पद्धतीने चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी साहेब यांनी हर घर नल से जल या योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवनची कामे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच ग्रामपंचायतीने देखील प्रत्येक घराला पाणी मिळेल अशा पद्धतीने आराखडे बनवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.गेल्या दोन वर्षात पाटखळ गावासाठी विविध रस्ते व इतर विकास कामांसाठी सुमारे दहा ते बारा कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे. या निधीमधून रस्ते, जलजीवन ची कामे, ग्रामपंचायत अंतर्गत येणारे विविध विकास कामे प्रगतीपथावर असून महावितरण कडून नवीन डीपी नवीन कनेक्शन ची कामे पूर्ण झाली असल्याचे सांगितले. येथील वाड्यावर वस्त्यावरील लोकांना जलजीवन योजनेअंतर्गत लाभ व्हावा यासाठी वाढीव आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावी, मंजूर निधीतून होणारी कामे गुणवत्ता पूर्ण चांगल्या दर्जाची होण्यासाठी नागरिकांनी देखील लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांनी शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी, जनजीवन योजनेअंतर्गत होणारे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले, वाड्या वस्त्यावर रोड लाईटची सुविधा मिळावी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींची मस्टर भरून द्यावे, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासह विविध विकास कामांसाठी व रस्त्यांसाठी निधी मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर,भाजपाचे जिल्हा समन्वयक शशिकांत चव्हाण, मतदार संघ अध्यक्ष राजेंद्र सुरवसे दत्तात्रय जमदाडे सुरेश भाकरे, दामाजीचे संचालक तानाजी काकडे, दादा दोलतडे,दीपक सुडके, भीमराव मोरे, शहाजी उन्हाळे, किसन ताड, दत्ता साबणे,आकाश डांगे, दिगंबर यादव,चंद्रकांत जाधव राजेश डांगे, स्विय सहाय्यक रावसाहेब फटे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते

