मंगळवेढयात पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी मागेल त्याला टँकर मंजूर करा- आ समाधान आवताडे
16गावे व 225वाड्यावस्त्याना 22टँकरने होतोय पाणीपुरवठा,19 गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढता पाण्याचे स्त्रोत आटले असून नागरिकांना व जनावरांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून ही दाहकता कमी करण्यासाठी प्रशासनाकडे टँकर मागणी साठी येणारे सर्व प्रस्ताव तात्काळ मंजूर करून संबंधित गावांना व वाड्या वस्त्यांना पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत अशा सूचना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दूरध्वनी वरून संबधित विभागाला दिल्या आहेत.
आमदार आवताडे हे बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाने दिलेली निरीक्षकाची भूमिका पार पाडत असल्याने त्यांनी दुरध्वनी वरून संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सध्या मंगळवेढा तालुक्यातील १६ गावांतील २१५ वाड्या-वस्त्यांवर २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर आणखी ९ नवीन प्रस्ताव तयार असून दहा प्रस्ताव प्रलंबित आहेत या सर्व प्रस्तावावर मंगळवार पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी त्या गावांना भेटी देऊन व तेथील पाण्याची नेमकी वस्तूस्थिती यांची नोंद घेऊन त्याचा आढावा प्रांत कार्यालयाकडे सुपूर्द करून कार्यवाही करण्याच्या दिशेने टँकर सुरू करावेत अशा सूचना आ आवताडे यांनी दिल्या आहेत. आचार संहिता असताना निवडणूक आयोगाच्या परवानगीने निकृष्ट काम झालेल्या भोसे प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे आ समाधान आवताडे यांनी 30लाखाचा निधी आणून योजना चालू केली आहे . नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी मागेल त्या गावांना टँकर देण्यासाठी ग्रामपंचायत कडून आलेले परिपूर्ण प्रस्ताव दाखल करून घ्यावेत तांत्रिक बाबीचा अडथळा न आणता त्या गावाला टँकरची सोय लवकरात लवकर करावी असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले आहे.अपूर्ण असलेल्या नवीन आंधळगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील गावांना योजनेची अट न घालता पाणी टँकर तातडीने द्यावेत योजना चालू झाल्यानंतर तेथील योजनेचे पाणी देवून टँकर बंद करावेत तसेच भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे ज्या ज्या गावांना पाणी पुरवले जाते त्या संबंधित गावांनाही स्वच्छ आणि मुबलक व व्यवस्थित पाणीपुरवठा करून देण्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर उर्वरित गावांना व वाड्या-वस्त्यांना पाणी टँकरची आवश्यकता भासल्यास जाचक अटी व नियम न घालता पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात टँकरची व्यवस्था करावी असेही आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.

