पटेल वस्ती येथील जि.प.शाळेतील 20 विद्यार्थ्यांना एरंडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील घटना
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी येथील पटेल वस्ती जि प शाळेतील वीस विद्यार्थ्यांनी काजू व बदाम असल्याचे समजून एरंडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली असून उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून 14विद्यार्थ्यांना सोलापूर सिव्हिल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की खुपसंगी येथील पटेलवस्ती येथे पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळा असून येथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. आज दिनांक 5 रोजी नेहमीप्रमाणे येथील काही विद्यार्थी शाळा भरण्याअगोदर शाळेत दाखल झाले होते.या शाळेच्या आजूबाजूला एरंडाच्या बियाची झाडे आहेत. यावेळी एका विद्यार्थ्याने एरंडाच्या बिया सोलल्या त्या आतून पांढरया दिसत असल्याने ते काजू, बदाम असल्याचे सांगितले. त्याने त्या खाल्या.त्यानंतर उपस्थित 20 विद्यार्थ्यांनी त्या खाल्ल्या त्यानंतर थोड्यावेळाने शाळा भरली परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत बसले असता पंधरा-वीस मिनिटांनी एका विद्यार्थ्याला पोटदुखी मळमळ हा त्रास होऊ लागला. त्यानंतर अजून पंधरा-वीस मिनिटांच्या दरम्यान बिया खाल्लेल्या विद्यार्थ्यांना डोकेदुखी पोटदुखी मळमळने उलटी हा त्रास होऊ लागल्याने एकच खळबळ उडाली.
त्यावेळी उपस्थित शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून घेतले व अधिक चौकशी केली असता विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याचे समजले. त्यानंतर तातडीचाही विलंब न करता येथील शिक्षक बाबुराव माळी व धनसिंग चव्हाण यांनी सिध्दार्थ संतोष तांबे,आयान मकसद पटेल,ओम ज्ञानोबा हाके,किरण सिध्देश्वर वाले,
वैदांत वैभव माळी,आदित्य महेश वाले,आसरफ शहापीर पटेल,अंजली विकास वाले,संकिता राजाराम भोसले,जोया अलम इनामदार,श्रुती दऱ्याप्पा बंडगर,आराध्या अशोक वाले, पवन समाधान लवटे, राजकुमार संतोष तांबे,गौरी महादेव वाले, गणेश महादेव वाले,संस्कृती दऱ्याप्पा बंडगर,प्रेम रामचंद्र लवटे,प्रणव शंकर सांवत,श्रेया महेश वाले या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना मंगळा ग्रामीण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुलोचना जानकर व त्यांच्या पथकाने सर्व विद्यार्थ्यांना सलाईन लावून इतर प्रथम उपचार केले त्यावेळी विद्यार्थ्यांना थोडेसे बरे वाटू लागले.त्यानंतर यातील चौदा विद्यार्थ्यांना 108 व 102 या ॲम्बुलन्स द्वारे विद्यार्थ्यांना सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. तर यातील सहा विद्यार्थ्यांचा त्रास कमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयातच त्यांना ठेवण्यात आले आहे. सोलापूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना कोणताही धोका नसल्याचे डॉक्टर सुलोचना जानकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अचानक झालेल्या उलटी, मळमळ, डोकेदुखी मुळे पालकांची चिंता वाढली होती डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे व परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना झालेल्या विष बाधे मुळे शिक्षक व पालक तणावाखाली आले होते. दरम्यान आ समाधान आवताडे यांना घटना समजताच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर व सिव्हील हॉस्पिटल सोलापूर यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांना आधार देत विद्यार्थ्यांवर चांगले उपचार करून त्यांना बरे केले जाईल असे आश्वासन दिले.शाळेच्या परिसरातील एरंडाच्या बियांची झाडे काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

