Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढयासाठी ज्वारी क्लस्टर व टेक्निकल सेंटर मंजूर करणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मंगळवेढा येथील कृषी उद्योजकता मेळाव्यात ना राणे यांनी दिले आश्वासन

1,248

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
          मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी उत्पादकांना चांगला बाजार भाव मिळावा व बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ज्वारी प्रक्रिया क्लस्टर मंजूर केले जाईल तसेच उद्योग व्यवसायात आधुनिकता यावी यासाठी टेक्निकल सेंटर मंजूर केले जाईल असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे दिले.        

मंगळवेढा तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी चालना मिळावी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ, इंग्लिश स्कूल येथे केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 4रोजी दुपारी 3 वाजता कृषी उद्योजकता मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ना राणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ॲड सुजित कदम,सचिव प्रियदर्शिनी कदम महाडिक,माजी अध्यक्ष डॉ सुभाष कदम,डॉ मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम,प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार,माजी मंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे, भीमाचे कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,पवन महाडिक, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे माजी सभापती सोमनाथ आवताडे प्रणव परिचारक, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना ना. राणे पुढे म्हणाले मंगळवेढा सारख्या दुष्काळी भागात उद्योजक निर्माण व्हावेत या भागातील बेरोजगार युवक महिला यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे रोजगारनिर्मिती व्हावी, आर्थिक सुबत्तेत वाढ व्हावी यासाठी प्रियदर्शनी कदम महाडिक यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती देशाबद्दल असलेले प्रेम, निष्ठा यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर असलेला भारत देश आज पाचव्या क्रमांकावर आला असून 2030 मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. या भागात 44 उसाचे कारखाने असून देखील केवळ साखर हे उत्पादन केल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावा असा भाव मिळत नाही. त्यामुळे कारखानदारानी इतर प्रक्रिया उद्योग राबवून शेतकऱ्यांना जास्त भाव कसा मिळेल याकडे पाहिले पाहिजे. केंद्राच्या उद्योग खात्याकडून जमीन सोडून कारखानदारांना कर्ज,ज्ञान, मशिनरी,मार्केटिंग अशी सर्वतोपरी मदत केली जात आहे. आत्तापर्यंत एक लाख कोटी रुपयांचे उद्योजकता निर्मितीसाठी वाटप केले आहे. आपल्या भागात अनेक पिकांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने होत असले तरी त्याचे मार्केटिंग व्यवस्थित रित्या होत नाही.

           चीनमध्ये घराघरात उद्योग आहेत त्यामुळे तेथील उद्योजकता वाढीस लागल्यामुळे दरडोई उत्पन्न वाढले आहे. मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात 31 योजना दिल्या आहेत. अमेरिकेचे दरडोई उत्पन्न 56 लाख, ब्रिटनचे 48 लाख,असून भारताचे एक लाख 57 हजार उत्पन्न असल्याने दरडोई उत्पन्नात आपला देश मागे आहे. कोकणचे दरडोई उत्पन्न 35हजार होते परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने मंत्री झाल्यानंतर कोकणात उद्योग धंदे वाढीस लागल्याने त्या भागातील दरडोई उत्पन्न दोन लाख 40 हजार इतके झाले आहे. देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उत्पन्नात वाढ केली पाहिजे.ज्या भागात जी पिके व इतर उत्पादन मिळते त्या अनुषंगाने तेथे उद्योगधंदे उभा करावेत. कोकणामध्ये मत्स्य एक्सपोर्टचा उद्योग मोठ्या वाढीस लागण्यासाठी आपल्या खात्याने चांगली मदत केली असून अनेक जणांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. आपण स्वतः देखील मत्स्य एक्सपोर्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले मंगळवेढा हा भाग गरीब नसून या भागातील उद्योजकता वाढीस लागली पाहिजे या भागातील युवकांसाठी, महिलांसाठी हजार उद्योगधंदे असून उद्योग वाढीसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. कृषी उद्योजकता मेळावा भरून या भागातील उद्योजकता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाला आपण सर्वतोपरी मदत करणार आहे.ज्वारी क्लस्टर व टेक्निकल सेंटर देणार असून तातडीने त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. दिलेला शब्द आपण पाळणार असून ज्यांना उद्योग व्यवसाय करायचे आहेत त्यांनी अन्य उद्योगांची देखील मागणी करावी. जनतेच्या अडचणी सोडविणे व त्यांना सर्वतोपरी मदत करणे हे आपले काम असल्याचे सांगत त्यांनी उद्योग व्यवसाय वाढीसाठी मंगळवेढ्याला भरीव मदत करणार असल्याचे सांगितले.

          यावेळी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून उद्योग व्यवसाय वाढीसाठी दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा फायदा युवा व महिला उद्योजकांनी घेण्याचे आवाहन केले. यावेळी प्रास्ताविकात प्रियदर्शनी कदम यांनी मंगळवेढ्यात कृषी उद्योजकता मेळावा घेण्यामागची भूमिका स्पष्ट करीत तालुक्यात उत्पादित होत असलेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी व इतर उत्पादक अडचणीत येत असल्याचे सांगून मंगळवेढा भागात अन्नप्रक्रिया उद्योगास असलेली पोषक परिस्थिती मांडत या भागातील उद्योजकांना केंद्र सरकारने मदत करावी व या भागासाठी क्लस्टर देण्याची मागणी यावेळी केली. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More