नंदेश्वर येथे विज पडून चार जनावरे दगावली

अवकाळीच्या मदतीपासून शेतकरी वंचित

 

मंगळवेढा प्रतिनिधी

      मंगळवेढा तालुक्यात नंदेश्वर येथे दिनांक 9रोजी रात्री नऊच्या सुमारास मसनेर वस्ती येथील शेतकरी सिध्देश्वर नामदेव गरंडे यांच्या 4जनावरांवर वीज पडल्याने जनावरे जागीच दगावली आहेत.    

            अधिक माहिती अशी की गेल्या पंधरा दिवसांपासून मंगळवेढा तालुक्यात वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसाने मोठे थैमान घातले आहे.यामध्ये शेतकरी,पशुपालक यांचे मोठे नुकसान झाले आहे दिनांक 9रोजी नंदेश्वर भागात रात्री 9वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वीज पडून सिध्देश्वर गरंडे या पशूपालकाची  झाडाखाली एकाच ठिकाणी बांधलेली म्हैस,रेडा,खिलार खोंड,एक जर्शी गाय अशी चार जनावरे मृत पावली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याचे  लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आप्पा तुकाराम मोटे यांचे घर पडले आहे तर गेणा दोलतडे यांचे बेदाण्याचे नुकसान झाले आहे.

           गेल्या आठवड्यात लक्ष्मी दहिवडी, गुंजेगाव, मारापुर या भागात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले होते लक्ष्मी दहिवडी येथे वाऱ्याने उडालेले पत्रे जनावरांना लागल्यामुळे बारा जनावरे जखमी झाली होती. महावितरण कंपनीचे तीस ते पस्तीस पोल पडून लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेली जनावरे दगावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. एकीकडे लंम्पी रोगामुळे अनेक जनावरे बाधित आहेत लंपीच्या रोगासाठी हजारो रुपये उपचारासाठी खर्च होत असताना अवकाळी पावसाने पशूपालकावर आर्थीक संकट आणले आहे. महसूल प्रशासनाकडून नंदेश्वर येथील घटनेचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तलाठी बालसाब शेख यांनी दिली. 

Comments (0)
Add Comment